रत्नागिरी/प्रतिनिधी: रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमधील घर्डा केमिकल कंपनीमध्ये आज शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाले. या स्फोटात एकूण सहा कामगार म...
रत्नागिरी/प्रतिनिधी: रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमधील घर्डा केमिकल कंपनीमध्ये आज शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाले. या स्फोटात एकूण सहा कामगार मृत्युमुखी पडले आहेत. हे सर्वजण स्फोटानंतर लागलेल्या आगीत गंभीररित्या भाजले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. हा स्फोट कशामुळे झाला याबाबत अद्याप नेमके कारण समजू शकलेले नाही.
स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत सुमारे 40 ते 50 कामगार अडकले होते, अशी माहिती मिळत आहे; मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या स्फोटात जखमी झालेल्या इतर कामगारांना जवळच्या कळबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घर्डा कंपनीतील बॉयलर अतिशय गरम होऊन अचानक स्फोट झाले, असे सांगण्यात आले. या अपघातात मृत झालेल्या तसेच जखमी झालेल्या कामगारांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. या स्फोटाची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. दरम्यान, गेल्या वर्षभरातील लोटे एमआयडीसीतील ही सहावी घटना आहे. घर्डा केमिकल कंपनीमध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त कळताच या मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांनी लगेचच लोटे येथे धाव घेतली. कंपनी व्यवस्थापन, पोलिस अधिकारी, कामगार प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून घटनेची सविस्तर माहिती घेतली. प्रत्यक्ष घटनास्थळाचीही त्यांनी पाहणी केली.
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत तात्काळ लोटे येथील दूर्घटनास्थळाची पहाणी करण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकदेखील आहेत.
गंभीर कामगारास मुंबईला हलवणार
या स्फोटात जखमी झालेल्यांपैकी एका कामगाराची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या कामगाराला तातडीने मुंबईला हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे स्थानिक प्रशासनाने माहिती देताना सांगितले.